अंजीर, सीताफळाची अोळखा पाण्याची नेमकी गरज

अंजीर बागेला ठिबक सिंचनाच्या रिंग पद्धतीने अाणि सीताफळ बागेला ऑनलाइन रिंग किंवा समांतर ऑनलाइन पद्धतीने पाणी द्यावे. बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी सीताफळामध्ये पाणी देताना जमिनीचा प्रकार व मातीची वाफसा अवस्था पाहूनच पाणी द्यावे.
यशवंत जगदाळे, डॉ. सय्यद शाकीर अली

अंजीर व सीताफळ ही अतिशय नाजूक फळे असल्यामुळे पिकांच्या वाढीच्या काळात पाणी व्यवस्थापन योग्य झाले नाही; तर याचा परिणाम फळांच्या प्रतीवर होतो. 

आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर -
ठिबक, तुषार सिंचनामुळे जमिनीची वाफसा स्थिती कायम राखली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते व पिकांच्या मुळांची अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया जलद होते. पर्यायाने पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. 

पीकनिहाय सिंचनाचे वेळापत्रक -
- पिकाला पाण्याची किती गरज आहे व त्यानुसार ठिबक संच किती वेळ चालवला पाहिजे याची माहिती असायला हवी. पिकाला जास्त पाणी दिले की उत्पादन जास्त येते, हा चुकीचा ग्रह आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त वेळ संच चालवला जातो व पाण्याचा अपव्यय होतो. तसेच पीक उत्पादनावरही त्याचा उलट परिणाम झालेला दिसून येतो. या कारणांमुळे ठिबक संच वापरूनही त्याचा फायदा होत नाही. त्यासाठी पिकाची पाण्याची नेमकी गरज ओळखून सिंचनाचे वेळापत्रक बनवावे.
- सीताफळ, अंजीर, आंबा, पेरू, पपई, डाळिंब इत्यादी पिकाला पाण्याची किती गरज आहे व संच किती वेळ चालवावा यासाठी खालील सूत्राचा अवलंब करावा.
पाण्याची गरज व संच चालविण्याचा कालावधी कसा काढावा
एका झाडास लागणारे पाणी (लिटर प्रति दिवस) = अ × ब × क × ड / इ

अ - जमिनीतून होणारे बाष्पीभवन (पाण्याच्या बाष्पीभवनाची माहिती हवामान खात्याच्या वेधशाळेतून किंवा बाष्पीभवन पात्राद्वारे घेता येते.)
ब - पीक गुणांक (पीक गुणांक हा पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे ०.२ ते १.१५ च्या दरम्यान असू शकते.)
क - ओलित गुणांक ओलित गुणांक पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असतो तो ०.१ ते १.० एवढा पिकानुसार गृहीत धरावा.)
इ - संचाची कार्यक्षमता
ड - एका झाडाने व्यापलेले क्षेत्र (वर्गमीटर) = (दोन झाडांतील अंतर × दोन ओळींतले अंतर)

संच चालविण्याचा कालावधी (तास) = एका झाडास लागणारे पाणी (लिटर प्रति दिवस) / एका झाडाच्या तोट्यांची संख्या × एका तोटीतून येणारा प्रवाह (लिटर प्रति दिवस)

अंजीरः
ऑनलाइन रिंग पद्धतीने ठिबक सिंचन -
- अंजिराची मुळे ही जमिनीच्या वरच्या भागात असल्यामुळे अंजिराच्या झाडाला नियमित पाण्याची गरज असते.
- मातीच्या वरच्या थरांमधील ओलावा कमी झाल्या सूत्रकृमींची वाढ होते. परिणामी, झाडातील पाण्याचे वहन थांबते म्हणून बाग कायम वाफसा स्थितीत ठेवावी.
- बागेमध्ये ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. त्यासाठी ठिबक सिंचनाच्या रिंग पद्धतीचा अवलंब करावा.

ठिबक सिंचनाची रिंग पद्धत -
- पूर्ण वाढलेल्या झाडाखाली पडणाऱ्या सावलीच्या परिघामध्ये रिंग पद्धतीने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
- इनलाइन पद्धतीने रिंग झाडाखाली वापरल्याने ओलाव्याचे प्रमाण एकसारखे राहिल्यास झाडाची वाढ उत्तम होते, त्यासाठी ४ लिटर प्रतितास पाणी बाहेर टाकणाऱ्या क्षमतेचे ड्रीपर वापरावेत. दोन ड्रीपरमध्ये ७५ ते ९० सेंमी अंतर ठेवावे.
- झाडाला पाण्याचा योग्य प्रमाणात ताण द्यावयाचा असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा चांगला उपयोग होतो.
- जर पाण्याचा मोठा ताण पडला तर फळे लवकर पिकतात व फळे गळण्याचे प्रमाण वाढते.
- पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले तर अंजिराचे झाड निरोगी व सशक्त राहते व फळगळ होणे टाळता येते. त्यासाठी फळांची वाढ होत असताना बागेत सतत वाफसा स्थिती असणे गरजेचे आहे.

सीताफळ -
समांतर ऑनलाइन पद्धतीने ठिबक सिंचन -
पूर्ण वाढ झालेल्या सीताफळाच्या झाडासाठी ऑनलाइन रिंग पद्धतीने ठिबक सिंचन किंवा समांतर ऑनलाइन पद्धतीने ठिबक सिंचन योग्य असते.
ठिबक सिंचनाची दोन समांतर नळी पद्धत -
- या पद्धतीमध्ये पूर्ण वाढलेल्या झाडाच्या दुपारी १२ वाजता पडणाऱ्या सावलीच्या परिघामध्ये झाडाच्या खोडापासून सव्वा ते दीड मीटर अंतरावर दूर दोन्ही बाजूस ठिबकच्या दोन नळ्यांचा समांतर वापर करावा.
- ऑनलाइन पद्धतीमध्ये नळीवर ७५ ते ९० सेंमी अंतरावर ४ लिटर प्रतितास क्षमतेचे ड्रीपर बसवावेत. इनलाइन ड्रीपरच्या नळीचासुद्धा अशाप्रकारे वापर करता येतो.
- पूर्ण वाढ झालेल्या सीताफळाच्या झाडास उन्हाळ्यात साधारणतः ३५ ते ४० लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस लागते.
- पाण्याची मात्रा ही जमिनीचा पोत, पीकवाढीची अवस्था व हवामान या घटकावर अवलंबून असते. जमीन नेहमी वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.
- सीताफळ वाढीच्या काळात जर झाडास पाण्याचा ताण पडला, तर सीताफळाची फळे भेगाळतात किंवा तडकतात.
- पाणी व्यवस्थापनासाठी स्वयंचलित यंत्रणा (ऑटोमेशन) असेल तर पाणी व खतांची कार्यक्षमता वाढून उत्पादनात वाढ होते.

पेरू पिकात बहर नियोजनानुसार हवे पाण्याचे नियोजन
- पेरूला उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- फळधारणा चालू झाल्यानंतर बहर नियोजनानुसार पाणी व्यवस्थापन करावे व झाडांना पाण्याचा ताण देऊ नये नाहीतर फळगळ चालू होते.
- बहराच्या वेळी ठिबक सिंचन पद्धत असेल तर दररोज १-२ तास पाणी द्यावे. पाणी देताना जमिनीचा प्रकार व मातीची वाफसा अवस्था पाहूनच पाणी द्यावे.

संपर्क - यशवंत जगदाळे, ०२११२ २५५२२७
(विषय विशेषतज्ज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)

अाकृतीसाठी माहिती
अंजीर - अाॅनलाईन रिंग पद्धतीने ठिबक सिंचन -
अंजीर झाड
ठिबकची १६ मिमीची नळी
ड्रीपर
१२ मिमी नळीची रिंग 
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Zero Budget Farming | Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022

  Subhash Palekar about Importance Of Zero Budget Farming In Mission 2022